Friday, October 1, 2010

बरीचशी पुस्तकं...थोडीशी मी..

बरीचशी पुस्तकं...थोडीशी मी..

आज "रीटा" या सिनेमा चे ट्रेलर्स बघत होते. बघायचा आहे अजून हा सिनेमा. खरं तर बरेच दिवस झालेत तो रिलीज होऊनही...पण राहिलंय बघायचा. आणि खरं सांगायचं, तर ही रीटा मला अनोळखी नाही. १० वी नंतरच्या सुट्टीत मी भस्म्या झाल्यासारखी पुस्तकं वाचली होती. त्यातलंच हे---रीटा. १० वर्षं झाली ते वाचून. सगळा तपशील नाही आठवत त्यातला, आणि तो सिनेमा बघूनही समजेलच, पण नवल वाटतं ते एका गोष्टीचं. या विषयावरचं असं पुस्तक मी १६ व्या वर्षी वाचलं होतं..

तेव्हा काही फार समजलं नव्हतं. आणि 'हे असं का..याचा अर्थ काय आहे..असं खरंच घडतं का...असेल तर का घडतं...' असे कोणतेही प्रश्न पडले नाहीत हे मात्र खरं. तसे मला प्रश्न कमीच पडतात अशा गोष्टीत. अनेक प्रश्नांची उत्तरं काळाबरोबर मिळत जातात, आणि ती तेव्हाच मिळणं योग्य असतं असं मला वाटतं. त्यामुळे आज जेव्हा जाणवतं, कि अरे! ही गोष्ट तर आपल्याला आधीच माहिती होती...तेव्हा कळतं की त्याचा उत्तर हे असं आहे..
त्ये सुट्टीत "कोसला" वाचली होती. तीही अशीच अंगावर आली होती. आणि मग इरावती कर्व्यांच "युगांत", थोड्या वर्षांनी "ब्लास्फेमी", "नॉट विदाउत माय डॉटर" हीपण झाली वाचून. कोसला तर अजूनही कळेल का शंकाच आहे. म्हणजे जे काही वाचतेय ते असं भयंकर वाटून सगळ्या बाजूने मला घेरतंय ही भावना आजही होईल अशी धास्ती वाटते. असं अनेक पुस्तकांचं होतं. "काश्मीर-धुमसते बर्फ" हे तर मी ५ पानांच्या पुढे वाचूच नाही शकले.
तसा मी खूप वाचलंय हे आता लक्षात येत. रिकाम्या वेळात जेव्हा हि सगळी पुस्तकं आठवतात तेव्हा जाणवत, आपण खरंच बराच वाचलंय. मन सुखावतं या जाणीवेने.

आज मला नक्की काय सांगायचं आहे, माहित नाही. पण खूप विचारांचा कल्लोळ आहे हा. एक सिनेमा निमित्त ठरला, आणि पुस्तकांची आठवण झाली. खरं तर आईची पण. तिने कधी सवय लावली समजलंच नाही. लहान असताना किशोर, कुमार हि मासिकं, चंपक, ठकठक, चांदोबा...पेपर मधल्या बातम्या, चिंटू....आणि अगदी रामरक्षा, मनाचे श्लोक, सगळं सगळं...
विषयाला कधीच बंधन नव्हतं. विनोदी, गंभीर, देवाचं, ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक, कथा, छोटे लेख...किती नि काय!

पुढे मोठं होताना हे सगळं कमी होण्या ऐवजी विस्तारत गेलं. पु लं ची मोहिनी होतीच, पण स्वाभाविक पणे वाचली जाणारी मृत्युंजय, छावा, राजा शिवछत्रपती, राधेय अशी सगळी पुस्तकं वाचून झाली. पेपर मध्ये फक्त राजकारण नसतं, अजून खूप चांगल्या गोष्टी असतात हे लोकसत्ता वाचून समजलं. शनिवार-रविवारच्या पुरवण्यांची वाट बघायला लागले मी. निबंध लिहिताना हे उपयोगी पडेल असं तर वाटायचंच, पण त्याहीपेक्षा हे आपल्याला आवडतंय हि जाणीव जास्त होती. ९ वर्षांची असल्यापासून श्रीमद भगवद्गीता वाचता आणि म्हणता येत होती, त्यामुळे मोठेपणी काही वाचताना अनेक गोष्टी लगेच लक्षात येत. त्यातले पौराणिक संदर्भ आठवत जे लहान असताना आजीने, किंवा गीता शिकवताना फडके सरांनी सांगितलेल्या गोष्टीत असत...आपण आतून कुठतरी समृद्ध होतोय असं वाटायचं.
यातल्या अनेक गोष्टींचं श्रेय आईला आणि बाबांना जातं. खरं तर मला गीता वगैरे शिकायचीच नव्हती. गीता काय असते हेही माहित नव्हतं. महाभारत बघून थोडाफार जे समजलं तेही "हि काहीतरी गुंतागुंत आहे संस्कृत मधली" असं वाटायचं. पण सरांची मुलगी आणि मी एकाच वर्गात, तेव्हा एकमेकींच्या नादाने शिकू, बोलणं, उच्चार स्पष्ट होतील असं विचार आईने आणि सरांनी केला आणि नाखुशीने मी शिकायला सुरुवात केली. पण मग मात्र गोडी वाढत गेली. ३ वर्षात ५ आणि मग ८ वीत संपूर्ण संस्कृत घेऊन केवळ आवड म्हणून उरलेले १३ अध्याय संथा घेऊन शिकून झाले. बाबांनी गीतेवर लिहिलेली टिपणांची वही मिळाली तेव्हा या सगळ्याचा सार्थक झालंय असं वाटलं.
वाचन सगळीकडून वाढत होतं. गौरी देशपांडे, सेतुमाधव पगडी...योगी अरविंद, विवेकानंद...संत चरित्र, क्रांतिकारकांच्या कथा, सुनिता देशपांडे, क्वचित कधी व पु काळे....
कुटुंब कथा, मासिकं, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, नाटक, सिनेमा, आत्मचरित्र.....लायब्ररीत जायचं, आणि निवांत हवं ते पुस्तक घेऊन यायचा. घरी आला कि जेऊन पुस्तक हातात घ्यायचा ते वाचून संपवायचं. हा झालं सुट्टीतला उद्योग. कॉलेज असला कि एखादा पुस्तक ८ दिवस पुरायचं. पण रात्री काहीतरी वेगळं वाचल्याशिवाय झोपायला जाववत नसे. एका बाजूला इन्जिनिअरिन्ग आणि दुसर्या बाजूला हे वाचन...गल्लत नाही केली कधी, पण धीम्या गतीने का असेना, पुस्तकांबारोबारचा प्रवास चालू ठेवला. शनी-रविवारच्या पुरवण्या होत्याच. त्यातून ओळख झाली अच्युत गोडबोले, मुकुंद टाकसाळे, मुकुंद संगोराम, राणी दुर्वे, शुभदा चौकर, आणि अनेक अभिनेत्यान्म्धल्या लेखकाची.

मी लहान असताना आई सांगायची, हे वाच, ते वाच, हे चांगला आहे...ते आवडेल तुला...आता मी सांगायला लागले. आई-बाबांशी बोलताना अनेक पुस्तकांचे संदर्भ आले कि त्यांना आजही बरं वाटतं.

पुस्तकांनी मला काय दिलं ते सांगता नाही येणार. मला काय येतं, काय माहिती आहे, मी किती वाचलंय...याचा हा लेखाजोखा नाही. अजून खूप काही वाचायचं आहे. एकाच वेळी अनेक विचारांचा कल्लोळ झाला कि धड काहीच नाही सांगता येत तसं झालं आज. खूप सांगायचं राहिलंय...पण मनात कुठेतरी खूप समाधान आहे. योग्य पुस्तकंची सांगत मला मिळाली याचं, आणि हे सगळं मला देणारे आई-बाबा लाभले याचं!